सत्तेतील मोकाट "कलाकारांना" कोण आवरणार? पटतंय का पहा! गजानन खंदारे
पटतंय का पहा! नाही तर सोडून द्या..
आजच्या न्यूज चॅनेल्सनी स्वतःचा एक ठराविक साचा तयार करून घेतला आहे –
कुणी कोणाला काय बोललं, कोण कुणाला ढकललं, कोण रुसला, कोण फुगला, कसा फुटला, कोणत्या भाषणात कोणत्या मसाल्याचा वास जास्त आला – एवढंच!
देशभर महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांची आत्महत्या, आरोग्य व्यवस्था यांसारखे खरे प्रश्न डोंगराएवढे वाढलेले असताना, टीव्हीवर मात्र "मोठे मुद्दे,खोटे मुद्दे" म्हणजे केवळ राजकीय बाचाबाचीचे थरारक सोहळे. खऱ्या समस्या तर बातम्यांच्या बुडाशी पण दिसत नाहीत.
काल वृत्तपत्रात दोन बातम्या डोळ्यात भरल्या.
पहिली बातमी – “वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करा!”
दुसरी – “रस्त्यावर बसणाऱ्या मोकाट गुरांचा त्रास वाढला!”
(काल कुणीतरी सांगत होते ,हल्ली शेतातल्या वन्य प्राण्यापेक्षा गावातल्या कुत्र्यांचा उपद्रव खूपच वाढलाय म्हणे !रात्र भर कलागत करून विव्हळत असतात म्हणे ..रात्री ती अन दिवसा channel वरील ..आम्ही निजायचं कसं !)
आता ह्या मागण्या नवीन नाहीत. कधी माकडांचा उच्छाद, कधी डुकरांची घाण, कधी भटक्या कुत्र्यांचे टोळके –असते , प्रत्येक वेळी प्रश्न तोच, मागणी तीच,
सरकार तरी कुणा कुणाला आवरणार?
पण या दोन बातम्यांच्या पुढेच तिसरी बातमी होती –
भवनात कॅमेऱ्यामध्ये झालेल्या हाणामारीची.
आणि मग खरा प्रश्न उभा राहिला – सरकारने आधी रस्त्यावरच्या प्राण्यांना आवरायचं का, की सत्तेच्या गल्लीत (..!..) on कॅमेरा चाळे करणाऱ्या या उन्मत कलाकारांना ?
वनविभागाला फोन करून आपण बिबट्या शिरल्याची तक्रार करू शकतो.
पण सदनात ,रस्त्यावर जेव्हा कायदे बनवणारे ‘जनतेचे प्रतिनिधी’ हाता-बुक्क्यांचा व "तोंडाचा" खेळ करतात, कायदा हातात घेतात तेव्हा तक्रार कुणाकडे करायची ?
सरकार कोणाला आवरेल हा प्रश्नच नाही मुळी
सरकारलाच कोण ‘आवरणार’? ते ठरवण्याची वेळ आता जनतेवर आहे.
जनतेला सल्ला देणारे, आपल्याच घरातच,किंवा सार्वजनिक नियम मोडतात. ही केवळ असभ्यता नाही; तर हा लोकशाहीवरील हल्ला आहे.
निवडून आल्यावर सत्तेच्या खुर्चीत बसलेले,
ज्यांनी संविधानाच्या शपथेवर जबाबदारी घेतली.
तेच जेव्हा गोंधळ घालतात, जीभेचा तोल सुटलेली भाषा वापरतात.
तेव्हा प्रश्न हा नाही की "ही घटना लाजिरवाणी आहे?
लोकशाही आता नाचणारी प्रतिमा झाली आहे का?
आणि मग पुन्हा
टिव्ही च्या स्टुडिओत चर्चा नावाचा एक ‘तमाशा’ पाहण्याचा मोफत पास असतो
तिथे चर्चेचा विषय असतो –
सभागृहात कोणता कलाकार
किंवा कोणत्या सत्तेतील ‘महानुभाव च्या भाषणात कोणत्या मसाल्याचा वास जास्त आला, कुणाची डाळ किती शिजली होती
कधी कधी तर विषय वळतो आणि वाघ्या कुत्र्याच्या चर्चेवर संपतो.
देश उपाशी पोटी खंगत असतो, पण चर्चेतील दिवे आणि ग्राफिक्स मात्र "Exclusive, Superfast, Breaking" असतात.
ही चर्चा म्हणजे नागरिकांना निष्क्रिय मनोरंजनात गुंतवून ठेवण्याचा सरळ डाव असतो.
यातून खऱ्या प्रश्नांची "घाण" लपवायची असते.
आणि संध्याकाळ होते पुन्हा सुरु एक खास खेळ –
"बडे मुद्दे – छोटे मुद्दे! खोटे मुद्दे !!"
बडे म्हणजे कोणत्यानेत्याची जीभ सटकली, कोण कुणाला घातलं, कोण रुसला.कोण फुटला..
छोटे म्हणजे लोकांच्या नोकऱ्या, महागाई, कर्जबाजारी शेतकरी, आरोग्याच्या समस्या –
ज्यांना ‘ब्रेकिंग’चा मानच मिळत नाही.
स्टुडिओत बसलेले स्वयंघोषित तज्ज्ञ कोण?
तर – एक सत्ताधारी, एक विरोधक, एक निवृत्त अधिकारी,एक वक्ता, दुसरा प्रवक्ता
आणि एक निवेदक जो काहीही बोललं तरी नुसताच आक्रमक दिसतो.
चर्चा सुरू होते – कुत्रे कोण, वाघ्या कोण, कोणाचा खरा बाप कोण ! कोणाचा मसाला कुबट होता, कोणाला मटणाचा वास जास्त आला !
बातमी संपते तेव्हा प्रेक्षक विसरतो की, आपण खरं तर कोणत्या विषयासाठी टीव्ही चालू केला होता.
शेवटी- प्राणी आपल्या प्रवृत्तीने वागतात, त्यांच्याकडून आपण संस्कारांची अपेक्षा करत नाही. पण माणूस म्हणून निवडून गेलेल्या व्यक्तींकडून आपण संस्कार, संयम, शिस्त – यांची अपेक्षा ठेवतो.
रस्त्यावर मोकाट गुरं, माकडं, डुकरं... त्यांचा बंदोबस्त सरकार करू शकतं.
पण या "कलाकारांना" आवरण्याची जबाबदारी जनतेची आहे – मतदानाच्या वेळी!
शेवटी :लोकप्रतिनिधी कार्यकर्तृत्व सिद्ध करणारा असावा..! लोकप्रतिनिधी आपलं लक्ष्य गाठणारा असावा..! लोकप्रतिनिधी आपलं उद्दिष्ट साध्य करणारा असावा..! याबद्दल तुम्हाला काय वाटते ? खाली कॉमेंट बॉक्स आहे
Disclaimer:
हा लेख कुणाच्या नजरेत खुपल्यास, ती नजर बदला – लेख नव्हे!
इथे कुणाच्याच नावाने बोट नाही, फक्त समजूतदारपणाच्या नावाने हलकं कुरकुऱ्या सारखं लिहिलंय.
कोणताही नेता, प्रवक्ता, भक्त, ट्रोल, चॅनल किंवा चौकट – कुणाच्या भावना दुखावल्यास, त्या आधीच फार कोमेजलेल्या असतील असे समजावे.
कायदा, संविधान आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या परिघात राहून विचार करायला लावणं हे आमचं कामच आहे.
कोणी ‘रागावलंय का?’ असं विचारलंच, तर ‘रागावणं वैयक्तिक आहे, पण लेख सार्वत्रिक आहे’ असं उत्तर ठेवा. जय जिजाऊ 🙏
समाज सेवक म्हणून आता कोणी रहाले नाहीत, याची सुरुवात टॉप च्या leader कडून असते खरी गोम येथेच आहे, हे प्रकार काहीच नाहीत स्वतः PM भ्रष्टाचाराच्या चौकशीचा विरोध करतो.
उत्तर द्याहटवा