चला आता "आजपासून एक नवा नियम! "

 आठवतय का पहा ! २०१६ : रांगेतली  नोटबंदी



सामान्य माणसाच्या कुटुंबातला कर्ता माणूस  जर घरातल्या कुणालाही न सांगता एखादा ‘धाडसी’ निर्णय घेतो आणि तो निर्णय अंगलट येतो, तर आपल्या  घरातल्या सिनेमाचं कथानक ठरलेलं असतं...
अख्खं कुटुंब त्याच्यावर तुटून पडतं –
"विचार नाही, पुस नाही, व्यवहार नाही… घातलंस ना घर पाण्यावर!"

टोमण्यांचा भडिमार सुरू होतो.
कदाचित ! त्याच्याकडून घरखर्चाच्या हिशोबाची पाटी काढून घेऊन कारभारी पण  बदलला जातो .

पण
याच प्रकारचं धाडस जर  कुठलाही सार्वजनिक संवाद न करता,  देशाच्या कारभाऱ्याने केलं,

आणि देशातल्या १३५ कोटी लोकांना एकाच झटक्यात “चला, आता नवीन नियम” असं जाहीर करून वेठीस धरलं, 
तर काय होतं?

तर  त्याचे परिणाम तुम्ही आम्ही सर्वच भोगले  आहेत  .तेव्हा तुम्ही आम्ही   थोडा भूतकाळ आठवून, ,चाचपून बघायला हरकत नसावी .



२०१६ – नोटबंदीचा प्रयोगशाळा दिवस

८ नोव्हेंबर २०१६.
संध्याकाळी टीव्हीवर देशाचे कारभारी आले, गोड हसू देत जाहीर केलं —
“आजपासून ₹५०० आणि ₹१००० च्या नोटा कायदेशीर राहणार नाहीत.”
भ्रष्टाचाराचं उच्चाटन… ऐकायला जणू काही स्वातंत्र्ययुद्धाची घोषणा.

पण पुढे झालं काय?
रांगा लावून सामान्य माणसाचा श्वास घोटला गेला. लग्नाचं सिझन मोडून पडल , व्यवसाय कोलमडले , हॉस्पिटलमध्ये नातेवाईकाचा जीव गुदमरू लागला ,शेतमाल विकून पैसे लटकले ,  
सगळं ठप्प.
रांगेत उभं राहणं हेच देशभक्तीचं नवीन मापदंड बनलं.

“देशासाठी काहीतरी मोठं करतोय” असं मानणारे लोक, रांगेत घाम गाळत नोटा बदलत होते .
रांगेत उभं राहणं हेच देशभक्तीचं नवीन मापदंड बनलं.
“देशासाठी काहीतरी मोठं करतोय” असं मानणारे लोक, रांगेत घाम गाळत नोटा बदलत होते .
मग  
काळा पैसा बाहेर आला का? – आकडे सांगतात, जवळपास ९९% नोटा पुन्हा बँकेत परतल्या.
म्हणजे, फसवणुकीचे मास्टरमाइंड्स सहजतेने आपला पैसा ‘पांढरा’ करून गेले, आणि सामान्य माणसाला मात्र बँकांच्या दरवाज्यात घासून घासून मारलं.
गळ्यात मजेशीर म्हणजे, काही नेत्यांनी स्वतःला “मी फकीर आहे, झोळी घेऊन निघेन” असं म्हणून साधेपणाचं प्रतीक दाखवलं होतं.
पण नंतर माध्यमांमध्ये आणि चर्चांमध्ये असा उल्लेख होताना दिसला की, तेच लोक मोठ्या प्रमाणात विदेश दौर्‍यांवर गेले, महागडे वस्त्र-आभूषण, ब्रँडेड गॉगल आणि खासगी विमानप्रवास यांच्या बातम्यांमध्ये झळकू लागले. क्वचितच देशात दिसू लागले. अर्थात हे खरे नसावे ! तरी पण 
हे पाहून अनेक नागरिकांच्या चेहऱ्यावर उपरोधिक हास्य उमटलं.


डिजिटल इंडिया की डिजिटल लूट?
शेतकरी , छोटा दुकानदार, १५०० रुपयाची महिनाभर वाट पाहणारे निराधार , रोजगार हमीच्या रोजंदारीवर पोट भरून घरी जाणारे   मजूर या  सगळ्यांनाच या डिजिटल गाडीवर बसवण्यात आलं. मोबाईलवर एक क्लिक, QR कोडचा ‘बीप’ आणि व्यवहार पूर्ण.
पण ही गाडी वेगाने धावत असताना, अचानक कधी कधी कोणीतरी तुमचं सीट खेचून घेतय …
आणि लक्षात येते  — ड्रायव्हर आपण नाही, ड्रायव्हर दुसरेच कोणीतरी ! कदाचित "बूआ बाबा " आहेत

 
(कंसातील टीप : "काही लोकांना असं वाटतं की हा देश सध्या बूआ-बाबांच्या इशाऱ्यांवरच चालतो. अख्ख्या टीव्हीवर सध्या  "एक लोटा जल घेऊन,किंवा एखादं चमत्कारीक तेल " ,घेऊन येणाऱ्या बाबांनी आमच्या महिला व माणसाच्या मेंदूचा ताबा घेतल्याने बाबा शब्दा  विषयी आम्हाला प्रचंड आस्था आणि प्रेम आहे )


आज QR कोड स्कॅन करून भाजी घेणं, UPI ने चहा पिणं, शेअर बाजारात गुंतवणूक करणं — हे सगळं सोपं झालं.
पण हिशोबाच्या वहीत आकडे लिहिताना अनेकांच्या नाकी नऊ आले.

दारू जशी पोटात गेल्यावर रक्तात भिनते,
तशी "वन नेशन, वन टॅक्स" वाली जीएसटी
जन्माला येणाऱ्या बाळाच्या बाळात्यापासून
ते मृताच्या चादरीपर्यंत सगळ्यांच्याच  हिशेबात भिनली.

पुढे लगेच नोटबंदीचे धक्के  खाऊन सावरत चाललेल्या लोंकाना  मंत्र दिला गेला — “कॅशलेस व्हा, डिजिटल व्हा, जगाला झेप घ्या!” 


ड्रायव्हर बँका आहेत . तुमच्या डाट्यावर आधारित व्यवहार करणाऱ्या चार सिबिल, NBFC कंपन्या. (यातून गोपनीयतेचा भंग होतो व  तुमच्याच  डाटाचा बाजार या  चार सिबिल ,NBFC कंपन्या कडून मांडला जातो असा आरोप काही अडाणी लोन्कांचा आहे ) ) माणूस मरायला लागला तरी तुमच्याच खात्यातले पैसे आधार केवायसी शिवाय तुम्ही काढू शकत नाही .२०१८ च्या निकालात सुप्रीम कोर्ट काय म्हणते याचा विसर या बँकांच्या साहेबांना व  बँकांना पडला आहे .


अलीकडील माध्यमांतून आलेल्या एका घटनेनुसार — कर्नाटकमधील एका भाजी विक्रेत्याला थेट २९ लाख रुपयांच्या GST नोटीस आली. QR कोडवरून मिळालेल्या छोट्या छोट्या रकमांचा हिशोब मोठ्या उलाढालीसारखा  दाखवला गेला आणि एक दिवस दारात जाडजूड नोटीस उभी होती. भाजीच्या टोपलीऐवजी नोटीसीची टोपली — कदाचित हाच डिजिटल प्रगतीचा पहिला धक्का असावा !

अलीकडील बातम्यांनुसार पुण्यात.

  • बनावट बँक कॉल — ₹१२ लाखांची फसवणूक

  • ऑनलाइन टास्क स्कॅम — ₹३.५८ लाख लंपास

  • शेअर टिप्स घोटाळा — ₹४० लाख उडाले

  • गॅस बिल अपडेट स्कॅम — ₹९२,०००

  • फायनान्स/इन्व्हेस्टमेंट स्कीम — ₹१५ ते ₹२८ लाख लुट

  • क्रिप्टो स्कॅम — ₹१.६६ लाख गायब


तुमचं कुटुंब,मुले व तुम्ही सुद्बा मोबाईलच्या कैदेत? हा vdo तुम्हाला जागं करेल ! click here 


पूर्वी रेल्वेत खिसेकापू खिसा कापायचे,
आता डिजिटल खिसेकापू मोबाईल उघडून खातं रिकामं करतात.
पूर्वी बनावट नाणी, आता बनावट लिंक.
पूर्वी चोर पकडायला पोलीस धावत,
आता चोर पकडायला तुम्हीच हेल्पलाइनवर फोन लावता RBI च्या पोर्टल वर लोकपाल चा पत्ता धुंडाळता!

सरकार सांगतं — “जागरूक राहा, OTP शेअर करू नका.”
पण पाईपला भोकं पाडून “कळ सांभाळा” म्हणण्याने गळती थांबत नाही.
सिस्टीममध्येच छिद्र आहेत , आणि त्यातून कोट्यवधी वाहून जात आहेत.



शेवटचा सवाल

डिजिटल इंडिया मुळे व्यवहार सोपे झाले — यात शंका नाही.
पण देशाला कॅशलेस केलं, तर सायबर लुटीपासून ‘कॅश सेफ’ ठेवण्याची जबाबदारी कोणाची? अनावश्यक tax च्या भीतीतून कसे बाहेर पडणार ? या कॉर्पोरेट कंपन्यावर , ऑनलाईन जुगारावर नियमन कोण करणार ?
नाहीतर, हाच डिजिटल इंडिया आपल्याला डिजिटल गुलामीकडे नेईल.
आणि मग आपण रांगेत उभं राहू —
या वेळी नोटा बदलायला नाही, तर एप्लिकेशन  बदलायला रांगेत उभे असू !



गजानन खंदारे  
           उपाध्यक्ष
 (मराठी पत्रकार संघ रिसोड)

डिस्क्लेमर :

 हा लेख केवळआमच्या बोली भाषेत  वैयक्तिक निरीक्षणांवर आणि माध्यमांतून प्रसिद्ध झालेल्या माहितींवर मांडलेलं व्यंगात्मक व सामाजिक भाष्य आहे. यातील उदाहरणं माध्यमांतून आलेल्या बातम्या आणि लोकांच्या चर्चांवर आधारित आहेत. कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटनेवर थेट आरोप करण्याचा हेतू नाही.किंवा कुणाशीच याचा प्रत्यक्ष संबध नाही .असे वाटत असल्यास तो केवळ योगायोग असू शकतो .

© sheti mati @ cluster-find.blogspot.com 

write to us : support@kamachya-goshti.com



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

१००० रू महिन्याचा चा मास्तर, दोन शाळा व पेढ्यांचा मालक!

मुली व पालकांच्या या तिन अपेक्षा मुळे लग्न जुळत नाहीत