श्रावणात भक्ती कशी करावी? नाहीतर देव करायला गेले आणि ...
भूमिका / निवेदन
श्रावणात उपासनेचे महत्त्व वाढते. तथापि, चुकीच्या पद्धती (जसे की अशास्त्रीय पूजा, दिखाऊपणा, पर्यावरणाचा नाश) यामुळे "देव करायला गेले आणि खेव मागे लागला" अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे भक्तांनी साधी आणि पर्यावरणपूरक उपासनाच कशी करावी, याबाबत खालील लेख पारंपरिक ग्रंथ, संत साहित्य, सामाजिक अवलोकन, अनुभवी अभ्यासकांचे लेख आणि सामाजिक निरीक्षण यावर आधारित कमीत कमी शब्दात मांडण्याचा हा प्रयत्न --संपादक
श्रावण महिना आला की शिवाची उपासना, व्रतवैकल्यं, पूजाअर्चा या गोष्टींना विशेष महत्त्व दिलं जातं. पण आजकाल बऱ्याच ठिकाणी या उपासना चुकीच्या पद्धतीने केल्या जातात. काहीजण फक्त मोठेपणासाठी महागड्या पूजा करतात, तर काहीजण सोशल मीडियावर फोटो टाकण्यासाठी शिवभक्ती करतात. यातून खरी भक्ती हरवते आणि उलट मनात अहंकार, गोंधळ, आणि चिडचिड वाढते. म्हणूनच आपण विचार केला पाहिजे की खरी शिवभक्ती म्हणजे नक्की काय आणि ती कशी करावी.
शिव म्हणजे फक्त देवळातली एक मूर्ती नाही. शिव हे एक चैतन्य आहे, जे निसर्गात, प्रत्येक सजीवात आणि आपल्या मनात आहे. तो कुठे जन्म घेत नाही, पण सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे निर्माण होतात. तो जेव्हा संहार करतो, तेव्हा तो फक्त नाश करत नाही, तर पुन्हा नवीन निर्माण होण्यासाठी मार्ग मोकळा करतो. शिव हा डोंगरासारखा स्थिर, गंगेच्या पाण्यासारखा शुद्ध, आणि वाऱ्यासारखा मोकळा आहे.उत्पत्ती आणि ऱ्हास हे चक्र.
शिव सगुण म्हणजे दिसणाऱ्या रूपात आपल्यासमोर येतो. तो निसर्गात आहे – जसं डोंगर, नद्या, आकाश, झाडं.
तुकाराम महाराज "वृक्ष वेली आम्हा सोयरे म्हणतात ते उगाचच नाही "
तो माणसात आहे – जेव्हा कोणी प्रेमाने, निस्वार्थ भावनेने दुसऱ्याला मदत करतो. तो कलेत आहे – जेव्हा एखादा माणूस शांतपणे योग करतो, ध्यान करतो, अंतर्मनातून नृत्य करतो. पण हे सगळं दिखाऊ नसावं. शिव हा डीजे, गोंगाट, आणि लोकांना दाखवण्यासाठी नाचण्यात नाही. तो आतल्या शांततेत आहे.
शिवाची मूर्ती, अभिषेक, आरती हे सगळं त्याच्या तत्त्वाची आठवण करून देण्यासाठी आहे. जसं एखाद्याचा फोटो बघून तो माणूस आठवतो, तसं शिवाची मूर्ती बघून आपण त्याचे गुण आठवतो. पण मूर्ती म्हणजेच शिव नाही. त्यामुळे पूजा करताना मन शुद्ध आणि एकाग्र असणं जास्त महत्त्वाचं आहे.
शिव आपल्या मनात असतो. जेव्हा आपलं मन शांत असतं, राग, द्वेष, लोभ नसतो, तेव्हा खरा शिव आपल्यात जागा होतो. म्हणूनच मूळ गोष्ट मनाच्या शुद्धतेची आहे. पूजा किती महाग आहे, आरतीत किती लोक आहेत,कावड मंडळ यात किती सजावट व डी जे दिखाऊ पण यात नाही.
शिवाची पूजा म्हणजे स्वतःच्या मनावर आणि वागणुकीवर नियंत्रण ठेवणं. शिवलिंगावर जल अर्पण करणं म्हणजे आपल्या मनाचा ताप कमी करणं. बेलपत्र हे शरीरासाठी औषधी आहे आणि आरोग्य राखण्यासाठी उपयोगी आहे. उपवास म्हणजे उप+वास, म्हणजे जवळ राहणं – हे खाणं टाळण्यासाठी नाही, तर आपल्या मनाला संयमात ठेवण्यासाठी असतं.मात्र हल्ली उपवासाच्या पद्धती बदलल्या आहेत का ?
आज अनेकजण मंत्र, श्लोक म्हणतात, पण त्यांचा अर्थच समजत नाही. उगाच मोठ्याने बोलतात, अंधारात हात मारतात. मग बुवा-बाबा काहीही सांगतात आणि त्यांच्यामागे लोक लागतात. पण अशी पूजा केल्याने काहीच उपयोग होत नाही. कारण देवाला मोठ्या आवाजात बोलणं किंवा पैशाचं प्रदर्शन नको असतं. त्याला हवं असतं निर्मळ आणि शांत मन.
शिवाला साधं स्मरण जास्त प्रिय आहे. "ॐ नमः शिवाय" असं मनात शांतपणे म्हणणं, डोळे मिटून श्वासावर लक्ष देणं, मन शांत ठेवणं – हेच खऱ्या अर्थाने शिवसाधना आहे. यात काही खर्च नाही, फक्त सातत्य आणि श्रद्धा हवी.
शिवपूजा करताना काही गोष्टी टाळायलाच हव्यात. जसं की शिवलिंगावर तुळस, हळद, कुंकू टाकणं – हे शास्त्रात वर्ज्य आहे. प्लास्टिक, थर्माकोल वापरणं, कृत्रिम रंग वापरणं – हे पर्यावरणाला हानी पोहोचवतं. शिव म्हणजे निसर्ग – त्यामुळे शिवपूजेत निसर्ग रक्षण हाच एक भाग असावा.
काही वेळा पूजेमुळे घरात तणाव, खर्च वाढतो. लोक एकमेकांशी तुलना करतात. हे सर्व टाळावं. कारण खरी उपासना ही मन:शांती आणि समाधानासाठी असते. अहंकार वाढवण्यासाठी नाही.
आपले संत, जसं नामदेव, तुकाराम, ज्ञानेश्वर, गाडगेबाबा यांनीही याच विचारांचा पाठपुरावा केला आहे. त्यांनी नेहमी भावनांना, मनाच्या शुद्धतेला आणि समाजसेवेला महत्त्व दिलं. गाडगेबाबांनी तर देवपूजेसोबत स्वच्छता, समाजासाठी काम करणं हेच खऱ्या अर्थाने उपासना मानली.तुकाराम महाराज म्हणतात "मन नाही निर्मळ तेथे काय करील साबण "
म्हणूनच श्रावणातली शिव उपासना ही फक्त एक धार्मिक गोष्ट नाही, ती एक आत्मशुद्धी, पर्यावरणप्रेम आणि समाजहिताचा मार्ग आहे. भक्ती ही साधी, शुद्ध, आणि निस्वार्थ असावी. बुवा-बाबांच्या अंधश्रद्धेला बळी पडून, खर्च करून, गोंगाट करून काहीच पुण्य मिळत नाही. खरी पूजा ही मनापासून आणि शुद्ध भावनेतून केलेली असते – तिथेच शिव प्रकट होतो.
@शेती माती
अस्वीकृती :
हा लेख माहिती व मार्गदर्शनासाठी तयार करण्यात आला असून, यात दिलेली मतं ही संत साहित्य, धार्मिक ग्रंथ, सामाजिक निरीक्षण, व वैयक्तिक अभ्यासाच्या आधारे मांडलेली आहेत. कोणत्याही धार्मिक परंपरा, गुरु, संस्था, किंवा व्यक्ती यांना कमी लेखण्याचा उद्देश नाही. उपासना व आध्यात्मिक कृती याबाबत अंतिम निर्णय श्रद्धा, वैयक्तिक समज आणि मार्गदर्शक गुरु यांच्या सल्ल्यानुसारच घ्यावा. लेखामधील सूचना या सार्वत्रिक आहेत, त्या अंधश्रद्धा किंवा कर्मकांड टाळण्यासाठी दिशादर्शन करतात. वाचकांनी त्याचा वापर विवेकाने व जबाबदारीने करावा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा