बा.. विठ्ठला तुझं मौन का? : गजानन खंदारे

                बा विठ्ठला, तुझं मौन का? 




विठोबा —

 वारकरी संप्रदायाचा आत्मा, लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आणि संत परंपरेचा गाभा....

हाच विठोबा दरवर्षी लाखो वारकऱ्यांसोबत पंढरपुरात पोहोचतो, भक्ताच्या कंठातून अभंग वाहतो, आणि त्याच्या दर्शनासाठी मन झुकतं. पण आजचा काळ विचारतो आहे — हा विठोबा फक्त मूर्तीपुरता उरलेला आहे का? का तो समाजातल्या घटनांवर शांत राहून केवळ एक प्रतीक म्हणून उभा आहे?


विठोबाचं मौन ही काही वेळा भक्ताची कसोटी असते, पण अनेकदा ते समाजातील अन्याय, ढोंग आणि विसंगतींकडे दुर्लक्ष करत असल्यासारखं वाटतं. विचार करावा लागतो, की हा मौन नेमका कोणासाठी? आणि कशासाठी?

आज भक्तीचा मार्ग थोडा दिशाहीन झाला आहे. विठोबाच्या नावाने मोठमोठे सोहळे होतात, पुष्पवृष्टी होते, भव्य मांडव उभे राहतात. पण त्या सगळ्यात खऱ्या भक्तीचा, समतेचा, संतांचा मूलभूत संदेश कुठेतरी हरवतो. संकट आलं की विठोबा आठवतो, सण आला की पूजेला गर्दी होते. पण तुकोबा, नामदेव, चोखोबा, बहिणाबाई यांनी ज्या तळमळीने समाजाशी नातं जोडून देवाला आपल्या कर्मात उतरवलं, तो भाव आज कमी पडतोय.



संत तुकारामांनी जेव्हा समाजातील अन्याय, ढोंग आणि दिखाव्यावर भाष्य केलं, तेव्हा त्यांना विरोधाला सामोरं जावं लागलं. त्यांचे विचार दडपले गेले, अभंग गाथा बुडवली गेली, त्यांना झिडकारण्यात आलं. आजही जेव्हा कोणी सत्य बोलतो, समाजातल्या विसंगती दाखवतो, तेव्हा त्याच्यावर टीका होते, तो वेगळा ठरतो. आणि आपण मात्र शांत राहतो.


आपली भक्ती ही आस्था, विवेक आणि संवेदनशीलतेतून निर्माण व्हायला हवी. विठोबा हा केवळ देव नाही, तो एक दृष्टिकोन आहे. समतेचा, संघर्षाचा, आणि अंतःकरणाने जगण्याचा मार्ग आहे. विठोबाच्या मूर्तीत नतमस्तक होणं हे श्रद्धेचं प्रतीक असलं, तरी त्या मूर्तीमागील विचार समजून घेणं हे भक्तीचं खरे सार आहे.


विठोबा हा संघर्षात उभा असावा, न्यायाच्या बाजूने असावा, आणि सत्यासाठी उभं राहणाऱ्यांच्या मनात त्याचं रूप साकार व्हावं. मूर्ती ही नक्कीच श्रद्धेचा आधार आहे, पण भक्ती तीच खरी जेव्हा ती कृतीत उतरते. मंदिरात नम्रतेने झुकणं जितकं महत्त्वाचं, तितकंच अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं हेही विठोबाच्या शिकवणुकीचाच भाग आहे.

आजचा समाज, तुटलेली माणुसकी, ढोंग्यांनी व्यापलेली श्रद्धा, आणि जातपातीत अडकलेली विवेकशून्यता — याला उत्तर देण्यासाठी फक्त पूजाअर्चा पुरेशी नाही. समर्पण, प्रश्न, कृती आणि मूल्यांना जपणं — ही खरी भक्ती आहे.

विठोबाला नव्याने पाहायची वेळ आली आहे. तो मंदिरातही आहे, पण प्रत्येक निष्पाप संघर्षातही. तो गाथेतही आहे, आणि संवेदनशील कृतीतही. त्याच्या मौनाला आपण जाब विचारतोय, कारण त्या मौनातून मार्ग काढण्याची गरज आहे.

आपणच ठरवायचं आहे — विठोबा हा एका मूर्तीपुरता सीमित राहील का, की तो आपल्या विचारांत, कृतीत आणि समाजात न्यायासाठी उभा राहील? आणि जेव्हा आपण समतेच्या आणि विवेकाच्या वाटेवर चालू लागतो, तेव्हा त्या वाटेवरचा प्रत्येक माणूसच खऱ्या अर्थाने विठोबा ठरतो.



बा विठ्ठला, तू गप्प का?





बा... विठ्ठला, तू असा गप्प का?
तुझेच अस्तित्व असलेल्या चराचरात,
तुलाच शोधायचं
,आणि तुलाच पुजायचं!

*मग... नेमकं कसं? आणि कुठे?*


गाथा त्यांनीच बुडवली,
तुझ्याच नजरेसमोर...
तेरा दिवस उपोषण करून आत्मक्लेश पत्करला..,
कण्हत होतो — तुझ्यासाठीच...
पण तू मात्र शांतच — तेव्हाही, आत्ताही!

विचारांची हत्या करून,
सदेह वैकुंठाला पाठवलं तुकोबाला —
पण तू काही बोललाच नाहीस...
गप्पच राहिलास — तेव्हाही, आत्ताही!


तुझंच नाव घेऊन आमची टाळकी टिपणारे,
अमृतकुंडात अपवित्रता करणाऱ्या ढोंगी श्रद्धेच्या तोंडावर —
आम्ही घाव घालतोय...
तरीही तू कमरेवरचे हात हलवले नाहीस, देवा...
तेव्हाही, आत्ताही!

तुझ्याच अवताराचे संदर्भ सांगत आम्ही भांडतोय —
तुझ्यासाठीच, तुझ्या सत्यासाठी...
आणि तू मात्र निशब्द, निश्चल,
कमरेवर हात ठेवून युगानुयुगे उभा!
तेव्हाही, आत्ताही!

आता अजून किती संदर्भ द्यायचे तुला, देवा?
तू आता कमरेवरचे हात काढलेच पाहिजेत —
पुन्हा नव्या अस्त्रांनी आणि वस्त्रांनी साजरा हो!


तुझ्याच नावाने सुरू असलेल्या या दुकानदारीला,
माणसांत पेरलेल्या जातीय भांडणांच्या बिरादरीला,
आणि सडलेल्या व्यवस्थेच्या अन्यायाला —
संपवण्यासाठीच!


गजानन खंदारे 
रिसोड 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

१००० रू महिन्याचा चा मास्तर, दोन शाळा व पेढ्यांचा मालक!

मुली व पालकांच्या या तिन अपेक्षा मुळे लग्न जुळत नाहीत